Saturday, 20 September 2008

तो असा ..!

रिमझिम, संततधार बरसणर्‍या पावसाकडे अनिमिष बघत राहते मग मी अशावेळी .

हा असाच आवडतो का आपल्याला?

का?

...की त्यादिवशी बेभान होऊन कोसळत राहणार्‍या त्याच्या अफाट आवेगाची भुरळ पडली होती?

तो चिंब, स्तब्ध वृक्ष आणि त्या खाली उभ्या आपण.
आपण कान्हाला भेटायला आसुसलेली राधा आहोत अणि हा पाऊस आपली वाट अडवून सामोरा आलाय...किती विनवण्या केल्या तरी त्याची अखंड, अभेद्य भिंत खोलायला तो तयारच नाहीय मुळी...त्याचं पारदर्शी थेबांचं अपारदर्शी रिंगण पार करणं शक्य नाहीय आपल्याला ...असे काहीसे वेडे आभास होत राहिले ....मग रमलंच मन त्याच्या लयीत घुमनार्‍या नादात ...
घरी पोहोचायला उशीर झालेलाही समजलाच नाही मग.

आताही शिरशिरी आणणार्‍या त्याच्या कुंद झुळका पसरवतायत तेच, हवं-नकोच्या मधल्या आभासात गाठणारं, स्वयंभू औदासीन्य.

पण आता त्याचं आतल्या आत झिरपत राहणं मान्य करूनही त्याला मनापासून भेटायला शिकावं इतपत मैत्री झालीच आहे आमच्यात .


अशावेळी झाडं नाही का मूकपणे झेलत राहतात त्याचे अनिर्बंध, अशक्य चढ-उतार? कदाचित निघत असेल एकेक लहर त्यांच्या मुळा-मुळातून पाना-पानाला सांगत... 'त्याचे आभार माना.'

रस्त्यावरती साचलेल्या गढुळलेल्या पाण्यात उतरत राहणार्‍या थकलेल्या संध्याकाळी ढगांचे आकारही कळेनासे होतात, तेव्हा कळेल न कळेलसा तरीही तो झरत राहतो... सांदिकोपर्‍यात, रस्त्यांवर, गाड्यांवर.

रात्रीचा निवांतपणा माझ्यासारखाच त्यालाही बरा वाटतो.
खांबावरच्या दिव्याच्या उजेडात उमटताना दिसत राहतो मला तो .
मी आहे तुझ्या सोबतीला' मी त्याला हलकेच सांगते. खरंतर तोच मला सोबत करतोय....

अशावेळी अंधाराला बिलगत मिटत जाणार्‍या त्याच्याकडे मग बघत राहते मी अनिमिष ...

Thursday, 4 September 2008

नवीन वाटेवर...

घडू द्यावं का वेगळं काही घडत असेल आपल्या आयुष्यात तर ?

मन हो म्हणत असेल तर द्यावं, नाही का? नाहीतर पुण्यात आल्यावर पुन्हा जुन्या रस्त्याने पहिलाच प्रवास चालू ठेवावा की नाही मी ?

पण रेल्वेने जसं रुळ बदलून नवीनच डेस्टिनेशनकडे मोहरा वळवावा, तसं मुलांना शिकवायचं सोडून मी स्वत: आता चक्क परत विद्यार्थीदशेत आलेय. त्यामुळे सध्या मजा आहे. पुढे बघू काय होतंय ते.

मला असं नवं कोरं पान उघडायला मिळतंय, त्याबद्दल नवर्‍याला माझा सॉलिड हेवा-बिवा वाटतोय.पण मला मात्र ही नवीन वाट तिच्यावरच्या काट्याकुट्यांसकट आणि हो, असलीच तर, फुलांसकट रुजवायचीय पायांत.

तिला काही परत फिरण्यासाठी एक्झिट नाहीय ना..

Tuesday, 29 July 2008

Adios !

घरी परत जायचं म्हणून सामानाची आवारा-आवर करत होतो. हे तरी काय घरंच की ! एवढे दिवस याच्याच आसर्‍याला राहिलो. माहित होतं पहिल्यापासूनच... क्षणाचा मांड आहे, कधीतरी आवरायचाच... पण मन बेटं हळवं झालंच..!

अपरिग्रहाचं वारं ही लागू दिलं नाहीय मी स्वतः ला... किती गोष्टी जमवल्यात् ... आणि आता त्या काही सगळ्या बरोबर नेता येत नाहीयत, तशा त्या नेता येणार नाहीत , हे तेव्हाही माहित होतं पण तरी ...

--------------------------------------------

" हा मेरी मला खूप आवडतो रे, तुझ्या त्या होलेनबेक पेक्षा किती तरी जास्त " मी कारमध्ये बसल्या बसल्या समोरच्या रस्त्याकडे मनभरून बघत म्हणते "बाईसाहेब, आता आपली पुण्यातली गल्ली आठवा " माझ्या उमाळया-उसाश्याना कानाआड़ करत नवरा उच्चारतो. " ती बघ ती आपली आवडती बंगली.आज तिथे काका बागकाम करताना दिसतायत चक्क "...माझं लक्षच नसतं त्याच्या बोलण्याकडे .

घराभोवती फिरणार्‍या रस्त्यान्शीही किती जोडले जातो आपण...

हिरव्यागार झाडांच्या कुशीत लपलेलं हे घर.....किती जीव लावतंय...

इंडियन ग्रोसरी शॉप मधली मुलगी देखिल गहिवरते.. मी 'आम्ही जातोय' असं आवर्जून सांगितल्यावर .

दोन दिवस मी अगदी वेड्यासारखं वागत राहते. आदिला बिचार्‍याला कळतंच नाही, आई आपल्याला विनाकारण का रागावतेसारखी ? आणि सारखी बाहेर कुठे बघत बसते ?

"मला हवीय पण ती ट्यूलिपच्या फुलांची कुण्डी ..." सध्या मला ट्युलिपची फुलं जरा जास्तच आवडायला लागलेली असतात ..."अगं, बँगेत जागा तरी आहे का ? काहीतरीच काय ?" नवरा वैतागतो. त्याच्याशी आजकाल माझं वाट्टेल त्या कारणानी भांडण व्हायला लागलेलं असतं.

इथवर येतानाच्या वाटेतले सारे सुंदर क्षण मनात फेर धरत असतात. ध्यानीमनी नसताना एका वेगळ्याच दुनियेची सफर घडलेली असते... जीवाला जीव देणारे मित्र भेटलेले असतात.. त्यांचा निरोप घेणं अवघड झालेलं असतं...

जड़ मनानं मी कपडे आवरत राहते, भांडी-कुंडी जमवत राहते, देऊन टाकायच्या वस्तुंची यादी बनवत राहते.. मलाच कळत नसतं... हे मला काय होतंय...? इथे दहा दहा वर्षं राहणार्‍या आणि आता दहा वर्षं रहायच्या बेतानं आलेल्या, ज्यांच्याबरोबर परत जाण्यावरुन वाद घातले, त्यांची बाजू मला एकदम खरी वाटायला लागते...

पडीक चेहार्‍याने घरात फिरणार्‍या मला बघून नवरा हतबल झालाय, हेही माझ्या लक्षातही येत नाही.

मी अंगणात एकाच ठिकाणी पाचाव्यन्दा झाडू फिरवत असते, तेवढ्यात फोन वाजतो नवरा माझ्या हातात देतो. मी फोन कानाशी लावते आणि तो चिरपरिचित माझ्या कानावर पडतो ..."गायु , केव्हा येतेयस ग ? तुझी फार आठवण येतेय... तू येणार म्हणून इतकं बरं वाटतंय ..." पलीकडून आईचा मायेनं ओथाम्बनारा स्वर मनात शिरत जातो...

'बस झालं, या आता. कधी येताय ? आम्ही भरपूर प्लँन केलेत ट्रेक, गप्पा , पार्ट्या...' मित्र-मैत्रिणींचे मेल्स, स्क्रेप्स यायला लागेलेले आहेत. 'परवा एकटीच पावसात भिजले ....कविता सुचलिए ... तुला ऐकवायचीय कधी येतेयस ?' लाडक्या मैत्रिणीचं आर्जव माझ्या डोळ्यातून हलकेच वाहू लागतं ...

माझं 'ते' घर...माझं स्वतः च ते घर, माझ्या स्वागताला आतूर झालेलं मला दिसू लागतं...

एका क्षणी जाणवतं काय वेडी आहे मी...... माझं सारं आयुष्य मी ज्या वळणावर सोडून आले होते ते वळणंच तर फिरून आलंय पुढ्यात . आणि वाट बघतंय, हे सारे नवे नवे क्षण घेउन येणार्‍या नव्या माझी ...आणि या क्षणांना पकडून ठेवू म्हटलं तरी आपल्याला थांबता येणारे का त्यांच्यासाठी ?

सोबतीला आपली मायेची माणसं असतील तरंच या प्रवासाला दिशा आहे, अर्थ आहे ... या छोट्याशा मुक्कामातून जे काही हाती लागलंय ते राहिलंच की सदैव आपल्याबरोबर.

सारं आभाळ मोकळं होतं....मी आदिला उचलून घेत म्हणते "काय मग गोडुबा, जायचं ना पुण्याला? आजी आजोबा वाट बघतायत " आईची गाड़ी रुळावर आलेली आदिला कळते. " हो ..आजोबानी माझ्यासाठी गदा आणलीय ना !" तो डोळे मोठ्ठे करत म्हणतो.

"अगं, पण आपण 'मेरी'वर बंगला बांधणार होतो ना?" नवरा मिश्किल हसत उद्गारतो. माझ्या डोळ्यांसमोर मात्र माझी ती गल्ली उभी राहिलेली असते...

Tuesday, 22 July 2008

प्रेमात तुझ्या मी..

बाहेर अंगणात नेहमीपेक्षा जरा जास्त वर्दळ वाटली म्हणून थोडं थबकून पाहिलं तर, एक गोजिरवाणा पक्षी त्याच्या सखीसोबत त्यांचं इवलूसं घरटं बांधायच्या तयारीत दिसला.
काड्या, दोरे, कागदाचे कपटे, वाळकी पानं सारं सारं जमवताना त्याची चांगलीच धांदल उडाली होती.साहेब सार्‍या काटक्या अगदी पारखून घेत होते.
दुरून देखरेख करणारी त्याची सखी बाल्कनीच्या तूळईवर बसून मोठ्या कौतुकाने त्याच्या खटापटीकडे पाहत होती. जोड़ी भलतीच प्रेमात होती.

एका लयीत,एकाग्रतेनं चाललेलं त्याचं बांधकाम बघता बघता वाटून गेलं, एवढी समज कुठून येत असेल या इवल्याशा पाखरामध्ये ? आता वसंत आलाय त्याच्या प्रेमळ कुशीत आपलं बाळही हसेल -खेळेल ,हे कसं समजलं असेल त्याला ?

ही किमया करणारा निसर्ग अशी अनेक कोडी घालत आलाय मला नेहमीच . अगदी न थकता, न विसरता प्रत्येक ऋतूशी नेटका संवाद साधायचं त्याचं कसब अगदी अजबसं ... एकाच वेळी आश्चर्यात आणि मोहात पाडणारं...

त्याच्याशी आरपार जोडले गेलेलो आहोत हा साक्षात्कारही निव्वळ वेडावणारा... आवेगात कोसळणार्‍या थेम्बांत भिजताना हलकेच भिनत भिनत उतरत जाणारा...
त्याच्या आकूळ-व्याकूळ स्पर्शाचे धुमारे फुटत राहतात गात्रा -गात्रावर....मंतरलेल्या रेखीव क्षणांना वेढून घेत.. ओघळण्याआधी !

अशा वेळी उगाच वाटतं, माझं हे त्याला चहुबाजूनी निरखत राहणं तोही उमगून आहे चांगलंच.त्याच्या बहुरूपीत्वाला भुलून खुळावणं, त्याच्यासाठी शब्द वेचणं ...सारंच तो ओळखून आहे... आतून बाहेरून .

सळसळणार्‍या वार्‍याच्या झुळकीच्या लयीत नाहीतर ढगांच्या सुरेल लिपीतून जेव्हा तो गातो त्याच्या कविता...तेव्हा मला अचानक आकळत की त्याला कधीपासूनंच माहिताय ...

मी त्याच्या प्रेमात पडलेय, अगदी माझ्या अंगणातल्या त्या पक्ष्यासारखीच.

Monday, 7 July 2008

तरीही मज प्यारे माझे घरटे.

एकदाचे मी आणि आदी एसएफ ओ ला दाखल झालो. एक अख्खं वर्षं माझ्या सगळ्यात बेस्ट मित्राशिवाय (तसा मला तेवढाच एकुलता एक मित्र आहे :)) काढल्यावर जर मला त्याच्याबरोबर राहायची संधी मिळत असेल तर ती हातची बरी जाऊ देईन ?अर्थात तो मित्र माझा नवराही आहे आणि गमतीची गोष्ट अशी की तो आधी नवरा म्हणून माझ्या आयुष्यात आला आणि मग सख्खा मित्र बनला.

त्यामुळे जेव्हा त्याला पुण्यात राहू द्यायला त्याची नोकरी नाही म्हणायला लागली, तेव्हा माझ्या नोकरीला राम राम ठोकून (त्या आधी भरपूर चर्चा सत्रं भरवून, रात्री जागून जागून चाटिंग करून) त्याला पिडायला मी त्याच्यामागे अमेरिकेला प्रयाण केले

खरं सांगायचं तर या देशाने पहिल्या भेटीतच मला मस्त इम्प्रेस केलंय. इथे आले तेव्हा सृष्टीनं आपली जादूची छडी शिशिराकडे सोपविली होती. त्यामुळे पहिल्यांदा जाणवलेल्या काकडणारया थंडीचीच शाल पांघरून इथला अप्रतिम फौँल सीजन हावरटासारखा मनात साठवून घेतला .

मेपल वृक्षांच्या रेखीव पानांनी शिम्पलेले, हळद- कुंकवाचे सडे घातल्यासारखे, मावळतीच्या किरणांत न्हालेले रस्ते शब्दांत चितारणं मुश्किलंच. वसंत ऋतूचं कौतूक तर अजूनही सरत नाहीय... मला निसर्ग नेहमीच वेड लावतो, तिथे आपली सारीच रूपे एकदम प्रकट करणारया या सृजन भूमीचं काय सांगावं ?

इथे निसर्ग तुम्हाला भेटतो एखाद्या जादुगारासारखा. एका जादूनं तुम्ही मोहित होऊन त्याच्या प्रेमात पडेपर्यंत त्याच्या पोतडीतून तो दुसरी करामत बाहेर काढतो. मग काही मैलांच्या अंतरावरचा निळाशार,गारगार, धीरगंभीर प्रशान्त महासागर असो किंवा तशीच तिथून काही तासांच्या अंतरावरची लेक ताहो भोवती फेर धरणारी हिमाच्छादित शिखरे असोत...किंवा मग हजारो वर्षांच्या जीवनखुणा अंगावर बाळ्गणारी रेडवुड्स असोत....इतकी सगळी रूपं इतक्या जवळ जवळ पहिल्यांदाच पहिली.

आपल्या देशातही हे सारं वैभव आहेच की. पण मला जाणवला तो फरक एवढाच की आपल्या भारतात हिमाच्छादित शिखरे आणि समुद्र तसे लांबच एकमेकांपासून.त्याना जोडणारे रस्तेही नाहीत इथल्यासारखे, वेगाशी बांधलेले, सुबक, सुंदर.

रस्तेच काय पण इथल्या प्रत्येक गोष्टीतली शिस्त, कार्यक्षमता, शिष्टाचार, स्वच्छता, सर्वसामान्य नागरिकाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या पायाभूत सोयी, श्रीमंती... सारंच तोंडात बोट घालायला लावणारं...

'दिलवाले' मध्ये शाहरूख त्याच्या मित्राला जसा वासलेला 'आ' बंद करायला सांगतो तसं मला सांगायची वेळ आलीच होती.माझं प्रिय पुण सोडून दुसरं कुठलं ठिकाण मला एवढं आवडेल, असं मला वाटलं नव्हतं.

नोकरी सोडण्याचा मूर्खपणा करतेय म्हणून अनेकानी सावधही केलं होतं. पण " पश्चाताप होतोय का नोकरी सोडल्याचा?" असं अनुश्काने विचारलं तेव्हाचं माझं उत्तर आजही तेच आहे ह्याचं बरं वाटतं. ह्या अशा काही मोजक्याच निर्णयांचा मला कधीही पश्चात्ताप झालेला नाहीय. बाकी, नाही तर मी अशी का वागले, ह्यावर स्वतःला आणि नवऱ्यालाही छळण्याचा प्रघात मी आजपर्यंत मोडला नाहीय .

कितीही अमेरिकेचे गुण गायिले तरी एक मात्र अगदी अस्खलित जाणवलं, सारं आयुष्य इथेच राहणार्‍या महाभागांपैकी आपण नव्हे रे नव्हे

त्यालाही हेच, असंच वाटतंय. हे एक बराय.